चंद्रपूर : चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या टी-103 या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.जून महिन्यापासून या भागात वाघाने मोठी दहशत माजवली होती.
खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष्य केलं होतं. त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर या हल्लेखोर नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे.
या वाघाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, वाघाच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या आठवणी अनेकांसाठी दु:खद आणि थरारक आहेत.