वारजे माळवाडी येथील जागा भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राज्य शासनाने राखीव ठेवली आहे. मात्र यातील काही जागा संस्थेचे चेअरमन आबादास गोटे व सेक्रेटरी या दोघांनी संगनमत करून बिल्डरला विकली. आता त्या जागेवर टोळेजंग इमारत उभी आहे. या प्रकरणी गोटेंवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु बिल्डरवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाने संबंधीत बिल्डरवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
लक्ष्मण माने म्हणाले, सर्वे क्रमांक 35/ 2 क्षेत्र हेक्टर 86 आर सर्वे क्रमांक 36 /2 क्षेत्र 9 हेक्टर 35 आर या जागा भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राज्य शासनाने सुमारे 35 वर्षापासून राखीव ठेवल्या आहेत. खासदार शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सदर मिळकतीचे भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राखून ठेवल्या होत्या. परंतु यातील सर्वे क्रमांक पस्तीस एकर मधील पाच एकर जागा रामनगर गृहनिर्माण संस्थेला देण्यात आली आहे. सदरची जागा या संस्थेचे चेअरमन आबादास गोटे व सेक्रेटरी या दोघांनी संगणमत करून बिल्डरला विकली.
त्या लोकांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले त्यातील काही मूठभर लोकांना बिल्डरने जागा दिल्या यातील बहुसंख्य लोक वडार समाजातील असून दारिद्र्यरेषेखाली आहेत. या लोकांची घोर फसवणूक झाली असून भटक्या-विमुक्तांच्या नावाने भलत्याच लोकांनी या जागेवर प्रशस्त इमारती बांधल्याचे दिसून येते .गोटे व बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल त्यापैकी गोटेवर वर गुन्हा दाखल झाला आहे. आमचे लोक गरीब असल्याने बिल्डरला घाबरत आहे. आता शासनाने समोर येऊन बिल्डरवर गुन्हे दाखल केले पाहिजे. व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. अशी पुण्यातील पत्रकार परिषदेत मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा भटक्या-विमुक्तांच्या नावाने चालू आहे. भटक्या विमुक्त जमाती संघटना गेली तीस वर्षापासून , लढा लढत आहे. आमचे लोक गरीब असल्यामुळे सातत्याने लढणे परवडत नाही. प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून प्रशासनाच्या वतीने या शासकीय जागेची वासलात लागत आहे. अशीच परिस्थिती मुंढवा सेटलमेंट येथील जमिनीची आहे.