पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. या यात्रेत अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकार बरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे. आम्हाला तीन चाकी सरकार म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आता स्टेपनी म्हणून ठेवायचं आहे का? अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत केली आहे. अंधारे यांच्या टीकेला आता मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय सुरूच होत नाही. मात्र सुषमा अंधारे या पक्षात नवीन आहेत. त्यांना या पक्षाचा इतिहास, या पक्षाने मागे काय भूमिका घेतल्या आहेत याचा अभ्यास करावा. तुमच्या पक्षाचं चाक कधी काँग्रेसच्या गाडीला, कधी राष्ट्रवादीच्या गाडीला तर कधी भाजपच्या गाडीला असतं. हे असं करून तुमच्या पक्ष नेतृत्वाने तुमच्या पक्षाचा टायर फोडून घेतला आहे आधी त्याची काळजी करा. आमच्या पक्षाची काळजी घेण्यासाठी राजसाहेब समर्थ आहेत. असा टोला योगेश खैरे यांनी अंधारे यांना लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे ?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कधी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केली आहे. कधी मराठी माणसाला आळशी आणि कामचोर म्हंटले आहे. वाईट याचं वाटतयं की, हे सर्व सुरु असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र गुपचूप शांत बसले आहे. आम्हाला तीनचाकी सरकार म्हणायचे पण आता तुमचं कसं आहे. एक भाजप, दुसरं शिंदे गट, तिसरे बच्चू कडू असं तुमचं तीन चाकं झाली असतांना, राज ठाकरे यांना स्टेपनी म्हणून ठेवायचं आहे का? असा खोचक टोला अंधारे यांनी यावेळी लगावला.