अमरावती : पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा गर्भित इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना त्यांचे नाव न घेता दिला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राणा यांच्याबरोबरचा वाद संपुष्टात आल्याचं जाहीर केलं.
रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
आम्ही गांधीजींना मानतोय. पण भगतसिंह आमच्या एवढ्या डोक्यात आहे की आमची कधी सटकते ते माहीतच पडत नाही. त्यामुळे त्याचाही विचार करा. आम्हीही अपशब्द बोलणार नाही. आम्हीही आचार संहिता पाळू. कुणाचं मन दुखावेल असं कधी करणार नाही. केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मंत्रिपदासाठी करतोय असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज सर्व पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहेत. फेसबुकच्या कमेंटवर जाऊ नका. आजकाल अर्धा सोशल मीडिया पैशाने चालतो. खरी बाजू समोरच येत नाही. मला शेतकरी आंदोलनात मीडियाने एवढं चालवलं असतं तर शेतकऱ्यांच्या पाच सहा मागण्या पूर्ण केल्या असत्या, असा टोला त्यांनी मीडियाला लगावला आहे.
आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलन करावं आणि सत्तेत असलेल्यांनी सत्ता उपभोगावी हा गेमच आम्हाला पलटवून टाकायचा आहे. आम्हाला 10 आमदार निवडून आणायचे आहेत. आमच्या इशाऱ्यावर सरकार चाललं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.