पुणे : विश्रांतवाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धानोरे परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकांन खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येते आहे. दरम्यान 23 मार्चला अजय टिंगरे वय वर्ष 42 हे दारू पिऊन घरी आले होते. अजय हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते.
दरम्यान घरी दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी दारात उभे राहून शिवीगाळ केली. शेजारच्यांनी याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती. पोलिसांनी समज दिल्यानंतर अजय हे घरात झोपी गेले होते. परंतु सकाळी ते झोपेत असतानाच पुन्हा या शेजारच्यांनी येऊन त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये महिला देखील होत्या. या महिलांनी ‘ तू मार खाण्याच्या लायकीचा आहेस…’ असे म्हणून त्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल असे वक्तव्य केले.
त्यांच्या पत्नीने शेजारच्यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु या शेजारच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी अजय टिंगरे यांची पत्नी विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता अजय हे स्वतःच्या राहत्या घरातून आपली रिक्षा घेऊन बाहेर पडले आणि अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी खाणीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आता नवनाथ टिंगरे याच्यासह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.