मुंबई- आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्याचा महसूल वाढविण्याचा दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. कोरोना संकटामुळे राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या संकट काळात राज्याचा महसूल वाढावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राज्याचे वाईन धोरण राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच, वाईनचे परिणामकारक विपणन होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते.
ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.
दरम्यान, नभाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गांजा प्रकरणात आलेला अनुभव लक्षात घेऊन वाइन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपवली असावी असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.