नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर क्राईमचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नोकरी विषयक किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणा-या कोणत्याही पोस्टवर शहानिशा न करता विश्वास थू नये असे केंद्र सरकारने घोषित केले आहे.
व्हॅट्सऍपवरून व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने’अंतर्गत बेरोजगार तरुणांना सरकारकडून दरमहा 6,000 रुपये भत्ता दिला जात आहे. असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतची माहिती सरकारने ट्विट करून दिली आहे.
पीआयबीने अधिकृत ट्विटर (Twitter) अकाउंटवर फॅक्ट चेकद्वारे माहिती दिली आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, अशी कोणतीही योजना सरकार चालवत नाही.
ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हा मेसेज खोटा आहे आणि भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. यासोबतच असे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहनही पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.
तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तुम्ही PIB द्वारे ते तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही यासंबंधीची माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकता.