नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आतापर्यंत अनेक वेळा वादंग निर्माण झाले आहेत. पण नुकताच त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्रमध्ये वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे भाजप नेते देखील अडचणीत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीतून बोलवणे आल्याचे समजते सातत्याने भगसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता या दिल्ली दौऱ्यामध्ये भगतसिंह कोश्यारी यांची नेमकी कोणाशी भेट होते आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान एकंदरीत दबाव पाहता भगसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती देखील समजते आहे.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी ?
भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डि.लीट पदवी प्रधान सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक विधान केले. ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला विचारत होते. तुमचा आवडता हिरो कोण आहे? त्यावेळी आम्ही सुभाष चंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत होते त्यांचं नाव सांगत होतो. पण आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील. शिवाजी तर जुने आदर्श झाले आहेत. नवीन काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत हिरो इथेच मिळतील. असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते.