‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर आक्षेप घेण्यात आलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या घटनांप्रमाणे नाहीत, अशी टीका अनेक संघटनांकडून करण्यात येतेय. काही संघटनांनी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर नोटीस बजावली होती. सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाविरोधात आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला. नेमकं चित्रपटाला विरोध का होतोय चित्रपटात असं काय दाखवण्यात आलं आहे ? पाहूया.
मूळ इतिहासाला अनुसरून चित्रपटातील दृश्ये दाखवली गेली नाहीत, असा आरोप विविध संघटनांनी त्यांच्या नोटिशीत केला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीवरूनही बरेच आरोप केले आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला मराठी साम्राज्य म्हटलं गेलंय. मात्र ते मराठा साम्राज्य आहे. ज्या संघटनांनी नोटीस पाठवली आहे, त्यात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, मराठा सेवा संघ आणि ऑल इंडिया शिवजयंती महोत्सत्व समिती यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व भाषांचं ज्ञान होतं, मात्र त्यांना फक्त मराठी भाषेप्रती प्रेम होतं असं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्याचं म्हणणं आहे.
याशिवाय त्यांचा असाही आरोप आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, तेव्हा बाजीप्रभू देशपांडे तिथे उपस्थित नव्हते. मात्र चित्रपटात त्यांची उपस्थिती दाखवली गेली आहे.हर हर महादेव या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. अभिजीत देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सुबोध आणि शरदशिवाय यामध्ये अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्याही भूमिका आहेत. दिवाळी मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये भारतभरात प्रदर्शित झाला.
दरम्यान चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी सर्व आक्षेपांना उत्तर दिलं आहे.
‘सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिली आहे. ऐतिहासिक चित्रपटांनी प्रसंगांचं परीक्षण कऱण्यासाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहासकारांचीही नेमणूक असते. त्यांनीही मान्यता दिल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.तसेच आपल्याला आतापर्यंत पाठ्यपुस्तकांमध्ये कळलेल्या इतिहासाच्या पलिकडेही असंख्य घटना असतात, ज्या इतिहासकारांनी अनेक बखरींचा अभ्यास करून मांडलेल्या असतात. त्याच प्रसंगांवर आधारीत दृश्य सिनेमात घेण्यात आली आहेत, असा दावा अभिजित देशपांडे यांनी केलाय.