आयुष्यामध्ये असे बऱ्याच वेळा घडते की , एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे विनाकारण आपलाच मनस्ताप होतो. तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे प्रचंड संताप होतो. मग हे लोक अगदी कुटुंबातील जवळचे असू द्या , किंवा बाहेरच्या जगातील मित्रपरिवार किंवा अगदी ऑफिसचे बॉस असू द्या . प्रत्येक वेळी आपण उलटून उत्तर देऊ शकत नाही . कारण मनाला झालेली जखम ही मोठी पण असू शकते.
आयुष्यात बराच वेळा स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काही कठोर आणि सडेतोड निर्णय घ्यावेच लागतात . अनेक वेळा आपण वाचतो , ऐकतो की लोकांशी नाते संबंध नेहमीच चांगले ठेवावेत . परंतु वाघाची आणि बकरीची मैत्री ही कधीही होऊ शकत नसते. किंवा झाली जरी तरी त्यामध्ये केव्हा घातपात होईल हे सांगता येत नसते. त्यामुळे काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला विनाकारण होणारा मनस्ताप टाळता येऊ शकेल. तुमचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व नक्कीच बनेल. आणि हो तुम्हाला दुखावताना समोरचा नक्कीच दहा वेळा विचार करेन.
- सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे सेल्फ कंट्रोल… जेव्हा कोणत्याही वादविवादाला तोंड फुटत असतं तेव्हा बऱ्याच वेळा आपण भडाभडा उलटे उत्तर देण्याचा विचार करतो. आणि हीच नेमकी गल्लत होते . आपण भडाभडा उत्तर देत असताना समोरचा नेमकं काय म्हणतोय , यावर लक्ष न देता आपण आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा एकांतात बसून विचार करतो तेव्हा नेमकच बोलायचं राहून गेलं हे लक्षात येतं . आणि पुन्हा होतो तो मनस्ताप … ! म्हणून ऐकून घेण्याची ताकद वाढवा . आधी समोरचा काय म्हणतोय , हे संपूर्ण ऐकून घ्या . मग ते कितीही खोचक असले तरीही हे ऐकून घेतानाच आपली बाजू थेट शब्दांनी एका वाक्यात तयार करा . आणि हेच वाक्य तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. प्रत्येकाला उलटी उत्तर देणे आवश्यकच आहे . असे नाही सोडून द्या पुढे चला
- दुसऱ्यांनी आपली किंमत करावी ही अपेक्षा करण्यापेक्षा आधी स्वतःची किंमत करा . प्रत्येकाला सहज वेळ देणं बंद करा . मग अगदी ती व्यक्ती घरातली का असेना … यासाठी संभाषण सुरू करताना समोरच्याला आधी आपल्याशी बोलायला वेळ आहे का ? हे विचारा म्हणजे , पुढच्या वेळी तो सुद्धा तुमच्याशी बोलण्यासाठी तुमचा वेळ आहे का ? हे विचारण्याची तसदी नक्कीच घेईल.
- प्रत्येक निर्णयावर दुसऱ्यावर अवलंबून राहू नका . बारीक-सारीक निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात करा . काही मोठे निर्णय सुद्धा घ्यायला खरंतर हरकत नाही . चुकतील , धडपडाल पुन्हा नक्की उभे राहाल … त्यानंतर सोबत जे असतील ते तुमचेच लोक असतील.
- किरकोळ आहे पण तरीही आता महत्त्वाचे आहे ,कुठे किती वेळ द्यायचा हे देखील निश्चित करा . स्वतःच्या दिवसाचे एक वेळापत्रक ठरवा . ज्यामध्ये तुमच्या स्वतःच्या शरीरावर मनावर वेळ इन्व्हेस्ट करा. व्यायाम ,योग्य वेळेत जेवण ,वाचन ,विरंगुळा ,खेळ या महत्त्वाच्या बाबी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही हमखास विसरता. पैसा कमवणे महत्त्वाचे असेल तरी तो पैसा म्हातारपणी शरीराच्या दुरुस्तीवर घालवण्यापेक्षा मौजमजा करण्यात घालवायला अधिक मजा येईल.. नाही का ?
- तरीही कोणी तुम्हाला दुखावलेच आणि ती व्यक्ती जवळची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला लांब करणे पूर्णतः शक्य नाही . अशावेळी शांत रहा आणि गरम पाण्याने मस्त अंघोळ करा . तेवढ्या वेळासाठी तरी तुम्हाला रिलॅक्स नक्की वाटेल.
- ज्या व्यक्तीशी तुमचे सारखेच खटके उडतात . अशा व्यक्ती जर दुरावल्या तर तुम्हाला फरक पडत नाही . तर थेट दूर जा . पण काही व्यक्तींना पूर्णतः दुरावून टाकता येत नाही. अशावेळी थेट बोलायला शिका . मोठा श्वास घ्या आणि थेट सांगा . तुमच्या मनात काय आहे. अर्थात मला अमुक-अमुक वागणे आवडत नाही. त्यामुळे मला संभाषण साधल्यानंतर त्रास होतो. त्यामुळे यापुढे आपण कामापुरतेच जवळ राहुयात . कदाचित समोरचा तुमच्या या वाक्यामुळे नाराज होईल . हो पण स्वतःचा आत्मपरीक्षण नक्की करेल
तर मग आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा