मुंबई : सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये एका नवीन वादाची ठिणगी पडली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना थेट इशारा दिला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, “राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वी देखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टात हजर राहत नाहीत. म्हणून वॉरंट निघतात. ते खोटं बोलत आहेत, त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ. मला असं वाटतं मीडियाचा लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधान केली जात असावीत. सुरुवातीला मीडियाचं विशेष लक्ष नव्हतं, माध्यमात चर्चा व्हावी यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटी बाहेर काही केलं तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे. आम्ही सुरक्षा दिली आहे, सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू, पण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.” असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.