मुंबई- राज्यसभेनंतर आता येत्या 20 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यासाठी मतांच्या फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून प्रत्येक पक्ष सतर्क झाला आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईमध्ये पाचारण केले आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे.
भाजपतर्फे (BJP) महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 18 जूनपासूनच मुंबईत मुक्कामाला येऊन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी भाजपच्या आमदारांची (BJP MLA) मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मतदान प्रक्रियेची माहिती सर्व आमदारांना दिली जाईल. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने राज्यभरातील आमदारांचे वेगवेगळे गट तयार केले आहेत. सर्व गटप्रमुखांनी आपापल्या गटातील आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 18 जूनपासून भाजप आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. 18 तारखेला मुंबईतल्या पवईमधील रेडियन्स हॉटेलमध्ये शिवसेना आमदार उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांना मुंबईत दोन दिवसात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना फोनवरुन बोलावणं धाडलं आहे. काही अपक्षांनाही मुंबईत बोलावलं आहे. सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदारांना पुन्हा एकदा मतदानाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
कुणाला किती मतांची आवश्यकता?
निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी 162 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहज जिंकतील. काँग्रेसचाही एक उमेदवार जिंकेल पण दुसऱ्या उमेदवारासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. तर भाजपकडे 106 आमदार असून अपक्षांच्या मदतीनं भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. पाच उमेदवार जिंकण्यासाठी 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आदारांचं पाठबळ मिळवणं भाजपसाठी आवश्यक आहे.
कोणत्या पक्षाचे किती आणि कोणते उमेदवार उभे ?
शिवसेना- सचिन अहिर, आमशा पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस- एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर
काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे
भाजप- प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
कुणाकडे किती संख्याबळ?
विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी 27 मतांची गरज आहे. यासाठी कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे हे पाहुयात-
शिवसेना- 55
राष्ट्रवादी काँग्रेस- 53
काँग्रेस- 44
भाजप-106