मराठवाड्याच्या मातीनं केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीनं भुरळ पाडत जनमानसाचा आवाज बनलेले असंख्य नेते मराठवाड्यानं दिली. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाला विकासाचं स्वप्न दाखवलं, बरं केवळ स्वप्न दाखवलं नाही तर त्या स्वप्नांचा कित्येक वर्ष पाठलाग केला. पण काळ मोठा वाईट… या काळाने एक एक करुन आतापर्यंत पाच रत्न हिरावून नेली.
मराठवाड्याचं नेतृत्व चमकत असताना, राज्याला त्यांच्याकडून अपेक्षा असताना, काळाने नेत्यांवर असा घाला घालण्याची ही पाचवी वेळ… पाहुयात कोण आहेत हे 5 नेते ज्यांची अकाली एक्झिट झाली आणि मराठवाड्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला…
1) प्रमोद महाजन : प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते. पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात 1995 मध्ये प्रथमच बिगर कॉंग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली.आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले. 1996 मधील 13 दिवसांच्या वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्रिपद सांभाळले. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पंतप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन हे नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.
2) विलासराव देशमुख : विलासराव दगडोजीराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले, पहिली टर्म 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि दुसरी टर्म, 1 नोव्हेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2012 केंद्रीय मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणूनही काम केले . ऑगस्ट 2012 च्या पहिल्या आठवड्यात त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले,जेथे त्यांना यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदान झाले. 6 ऑगस्ट रोजी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे यकृत प्रत्यारोपणासाठी त्यांना चेन्नईला नेण्यात आलं 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता त्यांचं निधन झाले.
3) गोपीनाथ मुंडे : मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. 12 डिसेंबर 2010, रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला होता. गोपीनाथ मुंडे हे शिवसेना भाजपाच्या युती सरकारमध्ये 1995 ते 1999 या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्याच गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं.
2009 च्या लोकसभा निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांना 1 लाख 40 हजार 952 मतांनी पराभव केला होता.
2014 देशात मोदी लाटेत मुंडे दुसऱ्यांदा निवडून आले आणि पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झाले मात्र इथेच नियतीच्या मनात काही वेगळं होतं आणि तीन जून 2014 ला कार अपघातात गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं.
4) राजीव सातव : राजीव शंकरराव सातव हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. राजकारणी होते. सातव यांनी
22 ऑक्टोबर 2009ते 16 मे 2014 या कालावधीत त्यांनी हिंगोलीचे आमदार म्हणून काम पाहिलं, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी संघटनात्मक पद देखील भूषवली,तर 2014 च्या मोदी लाटेतही सातव हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःहून लोकसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यानंतर त्यांची गुजरात राज्याच्या निवडणूक प्रभारी म्हणून काँग्रेसकडून निवड करण्यात आली होती. सातव हे राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात त्यांच्या नेतृत्वात गुजरात मध्ये काँग्रेसनं चमकदार कामगिरी केल्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली होती. कोरोनाची लागण झाल्यानं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र 16 मे 2021 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि पुन्हा एकदा मराठवाड्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली.
5) विनायक मेटे : विनायक मेटे हे मराठा आरक्षण आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. तसेच ते अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. 3 जून 2016 रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. ते सर्वप्रथम शिवसेना – भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते विधानपरिषद सदस्य झाले. 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. 2014 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघामधून ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 14 ऑगस्ट 2022 रोजी गाडीच्या अपघातात मेटे यांचे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांचं अपघाती निधन झालं
या 5 नेत्यांच्या अकाली जाण्यानं केवळ मराठवाड्यातच नव्हे राज्यासह संपूर्ण देशाचं मोठं नुकसान झालंय हे मात्र खरं !