मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अजित पवार पवार म्हणाले, “महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे” असेही अजित पवार म्हणाले.
आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही वगैरे.. सरकार गेल्या अडीच वर्षात काम करतंय..तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत, कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही.. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे मुख्यमंत्र्यांचा हात आहे अशा चर्चा ऐकू येत असताना अजित पवार यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, ” मुख्यमंत्री बंडामागे असतील असं वाटत नाही, त्यांचा स्वभाव नाही. तसेच बंडाच्या मागे भाजप असल्याचं अजून दिसून आलेले नाही असेही पवार यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर’ पडण्याच्या विधानावर अजित पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं विधान केलेलं असावं. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणा करू.