मुंबई- आम्ही विरोधी पक्षात असताना वर्षातून कधीतरी राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी येत असू. आमच्या व्यथा त्यांच्या कानावर घालत असू, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे आज उद्घाटन पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ” मला आज या नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या वास्तूच्या अनावरण करण्याच्या निमित्ताने येथे येण्याचं भाग्य लाभलं. मुख्यमंत्री म्हणून मला स्वत:ला वैयक्तिक आनंद होत आहे. दरबार हॉल, राजभवन हे तसं काही आम्हाला नवीन नाहीये. आम्हीही जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळी वर्षातून एखाद-दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येथे येत होतो. राज्यपाल महोयदयांना भेटायचो, आमच्या व्यथा त्यांच्या कानावर घालत होतो
आपलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. 50 एकरात हे राजभवन आहे. इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रपतींकडून मराठीत महाराष्ट्राचा गौरव
गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्राशी (maharashtra) माझा ऋणानुबंध राहिला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राचा अर्थ सांगायचा झाला तर भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. अर्थातत भारताचं महान राज्य आणि क्षेत्र, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचा गौरव केला.
राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण केल्यानंतर ते संबोधित करत होते. त्यांनी आपल्या भाषणात मराठीतून महाराष्ट्राचा अर्थ सांगितला. महाराष्ट्राच्या महानतेचे अधिक आयाम आहेत. त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्रातील केवळ महापुरुषांची नावे घेतली तरी यादी कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवार आदी अनेक महापुरुष महाराष्ट्राने दिले. विचारधारा वेगळी असेल पण मानवजाताची उत्कर्ष करणे हाच सर्वांचा उद्देश राहिला आहे. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, अन्यायाविरोधात लढणाऱ्या वीरांची धरती आहे. देशभक्त आणि भगवत भक्तांची आहे. महाराष्ट्र हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अजिंठा ऐलोरा लेण्या आपल्याला समृद्ध करतात. महाराष्ट्रात प्रतिभा आणि निसर्गाचा विलोभनीय संगम आहे. इथलं आदरतिथ्य प्रसिद्ध आहे, अशा शब्दात रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राची महती विशद केली.