रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच नागरिकांनी बारसू प्रकल्प रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी इथ जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरदेखील जोरदार निशाणा साधला. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून अश्मयूगीन काताळ शिल्पाची देखील पहाणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला आवाहनदेखील केले. ते म्हणाले प्रकल्पाची माहिती हिम्मत असेल तर इथे येऊन द्या तो प्रकल्प ग्रामस्थांना समजावून सांगा आणि ग्रामस्थांनी होकार दिला तरच हा प्रकल्प करा असं आवाहन देखील सत्ताधाऱ्यांना केले आहे. तसेच पोलिसांना बाजूला ठेवून येऊन दाखवा म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंजदेखील दिले आहे.