भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मूळचे कोकणातले असणारे लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश आहेत. जाणून घेऊयात भारताचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याविषयी…
1957 साली उदय लळीत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात 1983 ते 1985 या काळात प्रॅक्टिस केली. एप्रिल 2004 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात सिनियर ॲडव्होकेट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उदय लळीत यांची 13 ऑगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या बारमधून न्यायाधीशपदी निवड झाली. न्यायाधीश लळीत यांनी अयोध्या खटला, मुंबई बाँबस्फोट खटला, याकुब मेमन याची फाशीला आव्हान देणारी याचिका, ओम प्रकाश चौटाला यांची शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भातील याचिका, सूर्यनेल्ली बलात्कार खटला अशा विविध खटल्यांच्या सुनावणीतून बाहेर पडणं पसंत केलं होतं.
सीबीआयनं न्यायमूर्ती लळीत यांची 2 जी खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती. लळीत यांनी माजी महान्यायवादी सोली सोराबजी यांच्याबरोबर 1986 ते 1992 काम केलं आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून लळीत यांनी त्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2000 रुपयांचा दंड ठोठावला होता. तिहेरी तलाक खटल्यासाठी स्थापन केलेल्या घटनापीठाचे ते सदस्य होते. तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी दिला. अनुसुचित जाती जमातींसंदर्भातील प्रिव्हेन्शन ऑफ अट्रोसिटीज कायद्याच्या दुरुपयोगाला कमी करण्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले.
काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात त्यांनी न्यायमूर्ती आदर्श गोयल यांच्याबरोबर निर्णय देताना अशा खटल्यात एफआयआर नोंदवण्यापूर्वी कशाप्रकारे प्राथमिक चौकशी करावी याची प्रक्रिया स्पष्ट केली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्यासह लळीत यांनी रंजना कुमारी विरुद्ध उत्तराखंड खटल्यात स्थलांतरित व्यक्तीला स्थलांतर केलेल्या राज्यात, त्या राज्यानं एखाद्या विशिष्ट जातीला अनुसुचित दर्जा दिलाय म्हणून तिला अनुसुचित जातीचा दर्जा मिळणार नाही हा निर्णय कायम ठेवला.
आपल्यानंतर सरन्यायाधीशपदी लळीत यांची नेमणूक करण्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी केंद्रीय कायदा व न्यायमंत्र्यांना सुचवलं होतं. वकिलांच्या मंडळातून म्हणजेच बारमधून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेले आणि त्यानंतर सरन्यायाधीश बनलेले ते दुसरे व्यक्ती ठरले आहेत पण ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्यानं त्यांचा कार्यकाळ फक्त 74 दिवसांचाच असणार आहे.