मुंबई : तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? मग विमा काढलात का ? तुम्ही तिकीट काढलं की तुम्हाला त्यावेळी विमा काढण्याचा ऑप्शन मिळतो. अवघ्या 35 पैशांमध्ये तुम्हाला 10 लाखांचा विमा मिळतो. मात्र अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात तर काही लोकांना ते काय आहे आणि कसा काढतात हे माहितसुद्धा नसते. चला तर मग जाणून घेऊया हा विमा कसा काढतात? तसेच त्यासाठी नेमक्या कोणत्या अटी आहेत.
दोन दिवसांपूर्वी बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातात तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला,तर हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले.या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयासह मृतांच्या वारसांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. दरम्यान,अशा अपघातप्रसंगी रेल्वेकडून प्रवाशांना विमा उपलब्ध केला जातो. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करताना तुम्हाला हा विमा घेण्याचा पर्याय दिला जातो. विमा घेणे वैकल्पिक असले तरी विमा हा घ्यायलाच हवा. अवघ्या 35 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळतो. जर रेल्वेचा अपघात झाला आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागला तर या विम्याची रक्कम तुमच्या नातेवाईकांना मिळते.
हा विमा कसा मिळवावा ?
विम्याचा पर्याय निवडल्यानंतर त्याबाबतची लिंक ई-मेल आणि मोबाईलवर पाठवली जाते.
त्यावरून तुमच्या वारसाचे नाव, मोबाईल क्रमांक, वय, नातेसंबंधांविषयी माहिती भरा.
दुर्दैवाने अपघात झाल्यास पीडित प्रवासी किंवा वारसदार या विम्याचा दावा करू शकतात.
विमा करताना कोणत्या अटी आहेत?
लाभार्थी हा संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करणारा भारतीय नागरिक असावा.
कन्फर्म आरएसी यांसारख्या तिकिटांनाच विमा लागू.
5 वर्षाखालील बालकांसाठी स्वतंत्र तिकीट आरक्षित न केल्यास विमा लागू नाही.
हा विमा कोणाला किती आणि कसा मिळतो?
अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख
अशांत: अपंगत्व आल्यास 7.50 लाख
जखमींचा वैद्यकीय खर्च 2 लाख
मृतदेह घरापर्यंत पोहोचवणे 10 हजार