पुणे : मानाच्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही अधिकारी तसेच कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही. राष्ट्रपती पदकापासून पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी वंचित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्ज सादर न करण्यामागे पोलिसांचा निरुत्साह असल्याची चर्चा पुणे पोलीस दलात सुरू आहे.पोलीस दलात उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येते.
प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात येते. पोलिसांसह कारागृह, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात येते. राष्ट्रपती पदकासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निवड होण्यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पदकासाठी इच्छुक असल्याचा अर्ज तयार करावा लागतो. या अर्जासह सेवा पुस्तकातील बक्षीसे, उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट तपास, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आदी बाबींची नोंद करावी लागते. मात्र पुणे पोलीस दलातून अर्ज करण्यामागे वेगळीच कारणे समोर येत आहेत.
पुणे पोलीस दलातील एक पोलीस हवालदार राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पोलीस हवालदाराला सेवा कालावधीत खातेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली होती. या शिक्षेची नोंद सेवापुस्तकात होती. सेवापुस्तकातील शिक्षेची नोंद राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळे संबंधित पोलीस हवालदाराने सेवा पुस्तकातील शिक्षेची नोंद काढून टाकण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील लिपकाशी संगमनत केले आणि शिक्षेची नोंद असलेले सेवापुस्तकातील पान बदलेले.
ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर चार महिन्यांपूर्वी पोलीस हवालदार आणि पोलीस आयुक्तालयातील लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदारा अटकही झाली होती. या घटनेमुळे पोलीस दलातील राष्ट्रपती पदकासाठीच्या इच्छुक पोलीस कर्मचारी धास्तावले आणि त्यांनी अर्जच सादर केले नाही, अशी चर्चा पोलीस आयुक्तालयात दबक्या आवाजात सुरू आहे.
यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही.अर्ज सादर न केल्याने पुणे पोलिस दलातील कर्मचारी यंदा राष्ट्रपती पदकापासून वंचित राहिले. पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा निरुत्साहामुळे राष्ट्रपती पदकासाठी अर्ज सादर करण्यात आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.