मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक वादंग , आरोप -प्रत्यारोप , सत्ता स्थापना आणि त्यानंतर सुमारे महिन्याभराच्या अवधीने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी खातेवाटप देखील जाहीर करण्यात आले. तथापि राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान लवकरच मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात आणखीन 23 मंत्र्यांची भर पडू शकते असे स्पष्ट संकेत वनमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह 20 मंत्री कार्यरत आहेत . सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येऊ शकतात. त्यानुसार 43 जणांचे मंत्रिमंडळ करण्यास मान्यता आहे. त्यानुसार आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. असे सुधार मुनगंटीवार म्हटले आहेत. हा विस्तार येत्या काही दिवसातच होऊ शकतो .
यामध्ये एकनाथ शिंदे गट , भाजप आणि अपक्ष यांमधील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता असून , मागील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आली नसल्याकारणाने या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना संधी देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल आहे. त्यामुळे नक्की कोणाला संधी मिळणार याकडेच आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.