पुणे : राज्यात आणि देशभरात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवून लाखो करोडोंचा गंडा सामान्य माणसांपासून ते अगदी महत्त्वाच्या लोकांपर्यंत देखील घालण्यात यशस्वी होत आहेत. वाढती बेरोजगारी पाहता अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी देखील आपल्या ज्ञानाचा चुकीचा वापर करत असल्याचा देखील निष्पन्न झाल आहे. मात्र आता सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी सायबर पोलीस ठाण्यामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ देखील नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
सीसीटीएनएस प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येते आहे. या प्रणालीचे अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच सीसीटीएनएस ०.२ लॉन्च करण्यात येणार असून ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची देखील दखल घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली.
पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रथमच माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी सायबर क्राईम, वाहतूक प्रश्न या विषयांवर थेट चर्चा केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अमुलाग्र बदल करण्यात येत असून वाहतूक पोलिसांच्या नियोजनाबाबत मोठे फेरबदल करण्याचा विचार असल्याच देखील यावेळी त्यांनी म्हटल आहे. तर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व कठोर कलमांचा वापर करण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यावर देखील भर दिला जाणार असल्याच नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी म्हंटले आहे.