पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड परिवाराचा पुणे जिल्हा आणि पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध आहे. धनंजय चंद्रचूड यांचं पुण्याशी असलेलं खास कनेक्शन जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून…
पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात चंद्रचूड यांचा एक वाडा असल्याचे जुन्या पिढीतील अनेक जण सांगतात. त्याशिवाय त्यांचे मूळ गाव असलेले खेड तालुक्यातील कनेरसर येथील वाडा तर अजूनही आपले अस्तित्व ठेवून आहे.यशवंतराव चंद्रचूड नूतन मराठी विद्यालयाचे विद्यार्थी. पुढे शिक्षण घेत ते प्रथम उच्च न्यायालयाचे व नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. आता त्यांचेच चिरंजीव असलेले धनंजय चंद्रचूड यांनीही तेच पद मिळवले आहे.
वडील यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्याने त्यांचा पुण्यातील संपर्क तुटला. तो वाडाही काळाच्या ओघात अस्तंगत झाला.यशवंत चंद्रचूड आधी मुंबईत व नंतर दिल्लीत गेल्यामुळे धनंजय यांचाही पुणे शहराशी फारसा संपर्क राहिला नाही. नंतरच्या काळात तेही मोठ्या पदावर गेल्यामुळे त्यांच्याबाबतीतही शिष्टाचार पाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला व संपर्क तुटला.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात.२०१७ मध्ये धनंजय चंद्रचूड यांनी कनेरसर गावास व त्यांच्या वाड्यास भेट दिली होती.
कनेरसर ग्रामस्थांना यशवंत चंद्रचूड आणि धनंजय चंद्रचूड या पिता-पुत्रांविषयी चांगलाच अभिमान आहे.यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन.१९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. पितापुत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याबरोबरच राज्यात एलएल.बी. परीक्षेत सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिक चंद्रचूड परिवाराच्या नावावर असल्याचं कनेरसर ग्रामस्थ सांगतात.
माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या नावाने कनेरसर येथे भव्य वाचनालय उभे करण्याचा कनेरसर ग्रामस्थांचा मानस आहे. तसेच देशाला दोन सरन्यायाधीश देण्याचा बहुमान गावाला मिळाल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे. यानिमित्त या गावची ओळख आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे, असेही येथील नागरिक आवर्जून सांगतात.