गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. 200 पेक्षा जास्त जण या घटनेत जखमी झाले असून 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जातेय. या पुलावर लोक फेरफटका मारण्यासाठी आले असताना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला आणि सर्वत्र एकच हाहाकार उडाला.
रविवारी सायंकाळी गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या घटनेत पुलावरील
सुमारे 500 हून अधिक जण नदीपात्रात पडले. या दुर्घटनेत 141 जणांना आपला जीव गमवावा लागला. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून याकामी लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जातेय. आतापर्यंत 177 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये.
असा पडला मोरबी नदीवरील पूल; हृदयाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO pic.twitter.com/x9kDhOsXoO
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) October 31, 2022
रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. घटनास्थळी 30 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 140 वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ब्रिटिशांच्या काळातील हा ब्रीज आहे. पाचच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या या पुलाची केबल तुटल्यानं ही दुर्घटना घडली. छटपूजेच्या निमित्तानं या पूलावर 500 ते 600 भाविक जमले असल्याचं सांगण्यात येत असून पूल अचानक कोसळल्यानं अनेक महिला व लहान मुलंदेखील नदीत कोसळली.
घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जातेय. केबल किंवा सस्पेन्शन असलेल्या या पुलाची लांबी 765 फूट असून या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मच्छू नदीवर दरबारगढ महल आणि लखधीरजी कॉलेजला जोडणारा हा पूल 1.25 मीटर रूंद आणि 233 मीटर लांब होता. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी या पुलाचं उद्घाटन केलं होतं. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारं सामान इंग्लंडहून आणण्यात आलं होतं. नुकतंच नूतनीकरण केलेला हा केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळं त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
25 ऑक्टोबर रोजी हा पूल जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. या पुलाची मध्यभागी दोन शकलं झाली आणि तो नदीत कोसळला. या पुलाच्या नूतनीकरण कामाच्या सखोल चौकशीच्या मागणीनं आता जोर धरलाय. ओरेवा ग्रुपकडं या पुलाच्या देखभालीची जबाबदारी होती. त्यासंदर्भात ही कंपनी आणि मोरबी नगरपालिकेत एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीनं मार्च 2022 ते मार्च 2037 या 15 वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असं या कराराद्वारे ठरवण्यात आलं होतं. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणं अशी अनेक कामं ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती. दरम्यान, पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीये तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केलीये. ‘इंजिनिअरिंगचा चमत्कार’ म्हटला गेलेला हा पूल असा अचानक कोसळल्यानं शेकडो लोकांचा बळी गेला त्याचं काय ?