बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांनी येऊ नये असा धमकी वाजा इशाराच दिला होता. आज आता थेट महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर बेळगावमध्ये हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाकायवर महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवर चढून घोषणाबाजी केली आहे. तसेच गाड्यांच्या समोर जाऊन ते गाडीखाली देखील झोपले आणि महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही अशा आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आज महाराष्ट्रातील मंत्री बेळगाव मध्ये जाणार होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याकारणाने कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये या उद्देशाने हा दौरा टाळण्यात आला होता.