नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आज तेलंगणा हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध दाखल अर्जावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तेलंगणा हायकोर्टाने बलात्कार प्रकरणी ट्रायल कोर्टाने नोंदवलेली शिक्षा रद्द केली होती.
बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पिडीतेची कौमार्य चाचणी अर्थात टू फिंगर टेस्ट केली जाते. या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच यापुढे अशी चाचणी कोणी केली तर गैरवर्तनाच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देखील केला आहे. लैंगिकदृष्ट्या सक्रिय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात असून, सत्यापेक्षा मोठे काहीही नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
त्याचबरोबर पीडित महिलेवर टू फिंगर टेस्ट म्हणजे पुन्हा एकदा अत्याचार करण्यासारखेच आहे. म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारांनी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाईन्स सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये पाठवाव्यात असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.