पुणे – राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आजपासून पुण्यातील साखर संकुल कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत शेतकरी संघटना, शेतकरी हे मैदानात उतरले होते. मात्र राज्यात अजूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यात अजूनही 50 हजार हेक्टरावर ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यात रखडलेल्या ऊसतोडीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. निर्धारित कालावधी संपलेला असतानाही फडात ऊस हा उभाच आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उभा असलेला ऊस कारखान्यावर जातो की नाही अशी स्थिती आहे. हा प्रश्न घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित कारखाना आणि साखर आय़ुक्त यांना निवेदने दिली आहेत. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याकरिता लढा उभा केला होता. असे असताना आता अंतिम टप्प्यात भाजप किसान मोर्चाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
काय आहेत भाजपा किसान मोर्चाच्या मागण्या
-राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची हमी द्यावी.
-अतिरिक्त ऊसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याच्या बिलातून कपात करू नये. अतिरिक्त लागणारा खर्च राज्यशासनाने साखर कारखान्यांना द्यावा.
-गाळप झालेल्या जळीत उसाला व तोडणी कार्यक्रम पेक्षा उशिरा तोडलेल्या उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे.
-गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास शिल्लक ऊसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रूपये अनुदान द्यावे.
या आंदोलनात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, माजी मंत्री राम शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, पुणे शहराध्यक्ष भारत जगताप, विलास बाबर , उध्दवराव नाईक, उत्तमराव माने, रंगनाथ सोळंके, रोहित चिवटे, प्रदीप आडगावकर, केशव कामठे, मनोज फडतरे सहभागी झाले होते.