पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन अटक केलीय. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं समोर आलं आहं. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावंही समोर आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधवच्या साथीदारालाही अटक केली आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात सौरभ महाकाळनंतर आता पुणे पोलिसांना दुसरा आरोपी संतोष जाधव (Police arrested Santosh Jadhav) याला अटक करण्यात यश आलं आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
संतोष जाधवला असे पकडले पुणे पोलिसांनी
संतोष जाधव हा गुजरातला त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलीसांची टीम गुजरातमधील भुज जिल्ह्यातील मांडवी गावात पोहचली. तिथे त्यांना नवनाथ सूर्यवंशी सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी त्यांच कौशल्य वापरल्यावर त्याने संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात लपवलं असल्याच सांगितल. संतोष जाधवला वेगळी खोली घेऊन देण्यात आली होती. तिथे त्याच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. ओळख लपविण्यासाठी संतोष जाधवने डोक्याचे टक्कल केले होते. त्याचबरोबर त्याने त्याचा पेहराव देखील बदलला होता. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांनी त्याला तो राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकून पकडले.
गेल्या 1 ऑगस्टला संतोषने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. या हत्येनंतर संतोष त्याच्या साधीदारासह फरार झाला होता. याच प्रकरणासाठी गेले अनेक दिवस मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर मोक्कासुद्धा लावण्यात आला होता. त्याच्या आतापर्यंत अनेक चोऱ्या, मारामारी यासंदर्भातील गुन्हे दाखल आहे. मात्र आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाल्यानंतर खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता.
नवनाथ सूर्यवंशी कोण ?
नवनाथ सुर्यवंशी हा सातारा जिल्ह्यातील वडूजचा राहणारा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो गुजरातमधे काम करतो. संतोष जाधवच्या तेजस शिंदे या साथीदाराचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रातील आणखीही काही तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत. हे तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोई टोळीकडून प्रभावित झाले आणि गुन्हेगारीकडे ओढले गेले होते.