मुंबई – हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवनात पार पडत आहे. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, शिवेसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.
आज शिंदे गटाने शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव निश्चित केल्याचं वृत्त आलं. शिंदे गटाच्या नव्या नावाने उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरु नका. हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाचं नाव वापरुन मतं मागा. आधी दास होते, आता नाथ झाले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. बंडखोरांना काय तो निर्णय घेऊ द्या, मग आपण आपली रणनिती ठरवूयात. शिवसैनिकांनी अशीच एकजुट दाखवा. आपण त्यांना धडा शिकवू. शिवसेना निखारा आहे, बंडखोरांनी पाय ठेवला तर जळून जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना कार्यकारिणीत गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे निक्षून बजावले.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणालाही वापरु देऊ नये, अशा आशयाचं पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आलं आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करम्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. आजच्या कार्यकारिणी बैठकीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले . यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे.
कोणते ठराव मंजूर ?
- – निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक
- – शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता.
- – त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- – शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.