ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे .ठाणे-कळवामधील मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. अयोध्या पोळ यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. आमंत्रित करण्यात आलेला कार्यक्रम एक बनाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात (Kalva Police Station) तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली.
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन… pic.twitter.com/YKMQWbiFAr
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 17, 2023
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अयोध्या पोळ यांनी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. सध्या अयोध्या पोळ सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. कळवा मधील मनीषा नगर भागात अहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला सर्वात शेवटी हार का घातला? म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अयोध्या पोळ यांच्यासाठी कसा रचला सापळा ?
कळवा मधील हा कार्यक्रम शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे या कार्यक्रमास येणार असल्याचे सांगून अयोध्या पोळ यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. असा आरोप ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.