नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटे चर्चा झाली. मात्र या भेटीमधील तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चा होते. आताच्या भेटीचं टाईमिंगही महत्त्वाचं आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. मंत्री तुरुंगात जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याचे मानले जात आहे. या दोन नेत्यांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ही बैठक अचानक झालेली नाही तर पूर्वनियोजित बैठक असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील एखाद्या विकासकामांबाबत ही बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० मिनिटांच्या बैठकीत राजकारणावर कितपत चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी रात्री भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला महाराष्ट्राशी संबंधित अनेक पक्षांचे नेते, महाविकास आघाडीसह भाजपचे अनेक आमदारही उपस्थित होते. या मेजवानीत मंगळवारी ईडीने कारवाई केलेले शिवसेनेचे नेते संजय राऊतही दिसले. राऊत आणि पवारही मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. अशा परिस्थितीत पवारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट अनेक राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या मेजवानीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहिल्यामुळे काही जण आश्चर्य व्यक्त करताना दिसले. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात कोणती खिचडी शिजते, हे येणारा काळच सांगू शकेल.