मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे ? याची कल्पना गृहखात्याच्या गुप्तचर विभागाला कशी समजली नाही असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
बुधवारी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेठ घेतली. मुंबईमधील सिव्हर ओक या शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे समजते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत असणारे पवार हे मंगळवारी सायंकाळीच मुंबईत परतले. गुप्तचर विभागाला आमदार गुजरातमध्ये गेल्याची माहिती न मिळाल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी कठोर शब्दांमध्ये या बैठकीदरम्यान संताप आणि नाराजी व्यक्त केली.
एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचं संरक्षण असणाऱ्या राजकारणी एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात गेल्यास त्यांच्यासोबत असणाऱ्या विशेष सुरक्षा दलामधील व्यक्तींनी यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक असतं. मात्र विरोधाभास म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई सुद्धा बंडखोर आमदारांमध्ये असून ते सुद्धा सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये आहेत.
संघर्षाची तयारी ठेवा – शरद पवार
आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना केलीय. आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर काल झालेल्या बैठकीची माहितीही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली.