नागपूर – नाना पटोले यांचे वकील सतीश उके आणि त्यांचे प्रदीप उके या दोघांना सहा एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. एका वृद्धेची जमीन बालकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका ६० वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे.
सतीश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून ते भाजप नेत्यांविरुद्धच्या भूमिकेसाठीही ओळखले जातात.
नागपुरातून उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली. पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. मुंबईत आणल्यानंतर पीएमएल कोर्टात न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासमोर हजर केले. ईडीने वकील हितेन बेनेगावकर यांनी सतीश आणि त्यांचा भाऊ प्रदीप यांच्या चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. कारण बनावट कागदपत्र आणि मुख्य ठिकाणी दीड एकर जमीन खरेदी प्रकरणात असहकार केल्याचा आरोप आहे. उके यांचे वकील रवी जाधव यांनी ईडीच्या कोठडीला विरोध केला. राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप उके यांच्या वकिलांनी केला.
उके यांच्या अटकेनंतर उकेंना २४ तासात कोर्टात हजर करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते ईडीचे अधिकारी पाळत नाहीत. अटकेचा मेमोही अद्याप दिलेला नसल्याचा युक्तीवाद जाधव यांनी केला.
रवी जाधव म्हणाले, “आम्ही ईडी कोर्टात युक्तिवाद केला. ईडीने केलेली कारवाई कशी चुकीची हे कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही ईडीच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात इलिगल डिटेन्शन आणि इतर मुद्यांच्या आधारे आम्ही जाणार आहोत. गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ” असंही जाधव यांनी सांगितलं.
कोर्टासमोर आपली बाजू मांडताना सतीश उके यांनी, “घरात मी झोपेत असताना बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK 47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक्ट होतो नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन २००७ साली वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधात खटले लढले आहे. माझ्यावर लोया यांच्या केस मध्ये दबाव टाकला गेला. मला फडणवीस यांच्या भावाकडून धमकावण्यात आलं होतं”, असं कोर्टाला सांगितलं. यावेळी युक्तीवाद करताना उके यांना न्यायालयात रडू कोसळले.