मुंबई : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबाच्या सातबाऱ्यावर वारस नोंद (Online Heir) करावी लागते. ही वारस नोंद (Online Heir) करण्यासाठी लोकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातो. अनेकदा तर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक देखील होत असे. वारस नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत होते. तरीदेखील ही नोंद होण्यासाठी खूप वेळ लागत असे. हा ताप वाचवण्यासाठी आता प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी वारस नोंद प्रक्रिया आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया एक ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन झाली असून आता सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता भासणार नाही. सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या अंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठीच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर वारस नोंद होणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत करावा लागणार अर्ज
जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला तीन महिन्याच्या आत वारस नोंदी साठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज आत्तापर्यंत तलाठ्याच्या माध्यमातून केला जात असे मात्र आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वारस नोंद अर्ज ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ई हक्क हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
वारस नोंद करण्याची कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया ?
वारस नोंद प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे. आता वारस नोंद करण्यासाठी ई हक्क या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतो. अर्जात जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा एसएमएस येतो. तलाठ्याकडून सादर झालेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर वारस नोंद केली जाते म्हणजेच फेरफार वर नोंद घेतली जाते.