मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यामुळे वातावरण चिघळते आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशा आक्षेपार्ह विधानांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा सनकून जाब विचारला आहे.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असायला पाहिजे होती. ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्ति सोबत करतात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत जा. ठराव मंजूर करा. हे मूग गिळून महाराजांचा अपमान सहन करतात. पण आम्ही हे सहन करणार नाही. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. असे यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच खोके सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू आहे. कोण बनेगा करोडपती प्रमाणे दिल्लीने सांगितले म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान करत आहेत असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.