मुंबई- पुढची पत्रकार परिषद थेट ईडीच्या कार्यालयासमोर घेऊन ईडीच्या घोटाळ्याचं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय या साऱ्याचा पर्दाफाश करु असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मला काय म्हणायचं आहे हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं कळतंय असाही राऊत म्हणाले. त्यावरून ईडी आणि फडणवीस यांचे नेमके कनेक्शन काय याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
ईडीकडून निकटवर्तीयांची होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्रं लिहलं आहे. या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि त्यांना माहितीये मला काय सांगायचंय ते.”
“हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबालाही भयंकर त्रास देत आहेत. खोटे पुरावे निर्माण करतात. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही.” असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा, अन्यथा…
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पाठवलेल्या पत्रात संजय राऊत यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करण्याचा काही लोकांनी मला गळ घातली होती. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. पण मी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी मला माझी रेल्वे मंत्र्यासारखं तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी देण्यता आली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे पत्रं म्हणजे ट्रेलर नाहीये. ट्रेलर अजूनही बाकी आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.