मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच बसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला अशी टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक भाविकांना हिंदू मंदिरांमध्ये पहाटे होणाऱ्या काकड आरतीचा आनंद घेता आला नाही , त्यामुळे हिंदूंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज भोंग्याचा विषय निर्माण झाल्यामुळे या देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि हिंदू भाविकांची गैरसोय झाली त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही असा गुप्तचर खात्याचा अहवाल असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
राज ठाकरेंचा हा विषय सामाजिक नाही हा धार्मिकच आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे. हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. मशिदीवरील भोंग्याचा विषय पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचा गळा घोटला हे स्पष्ट झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. असे संजय राऊत म्हणाले.