पुणे- राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पाठपुरावा करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज (12 मे) जाहीर केली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ” लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे”
“या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचं हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे.असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी देखील त्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.