पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज संपली आहे.
शनिवारी रुग्णालय प्रशासनाने जरी केलेल्या मेडिकल बुलेटिन नुसार त्यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. तर ते अजूनही वेंटीलेटरवर आहेत असे काही वेळा आले होते. आज सायंकाळी ४ वाजता त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांना गेली काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला होता. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केलं. चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही ते एक नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जायचे.
त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते. काही वर्षांपूर्वी ‘अग्निहोत्र’ मालिकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका चांगली गाजली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका घर करुन आहे. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं. विक्रम गोखले यांनी 2010 मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. त्यानंतर 213 मध्ये त्यांना ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.
विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. त्यामुळं त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते. विक्रम गोखले यांना 2013 मध्ये ‘अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2015 त्यांना विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होते. 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार तसेच 218 मध्ये पुलोत्सव सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आलं होतं.
मराठी-हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी या तिन्ही व्यासपीठांवर आपल्या अभिनयाची हुकूमत गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळं अभिनयाचं महाविद्यालय हरपलं. विक्रम गोखले यांना Top News मराठीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली !