पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मुलींना मायेची ऊब दिली. ज्यांनी पोटच्या लेकरांचा त्याग केला अशा प्रत्येक लेकराला त्यांनी आपलंसं केलं. या लेकरांच्या डोक्यावर केवळ आधाराचा हातच केवळ ठेवला नाही तर मुलींची लग्न देखील लावून दिली. त्यांचे संसार सुखाचे करून दिले.
पण आज त्यांच्या पाठीमागे त्यांच्या संस्थेच्या नावाने काही भामट्यांनी अत्यंत घृणास्पद काम केले आहे. या विषयी माईंच्या संस्थेकडून पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून , नागरिकांना देखील या भामट्यांच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
या भामट्यांनी आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत असे सांगून लोकांकडून पैसे उकळले आहेत. तसेच मुंबई मधून अन्नधान्य देखील गोळा केले असल्याचे समजते. या भामट्यांच्या जाळ्यामध्ये पुण्यातील हडपसर ,कोथरूड ,जळगाव ,संभाजीनगर येथील नागरिक फसले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेमध्ये सध्या विवाहयोग्य मुली नाहीत ,याची नोंद नागरिकांनी घ्यावी. मुलींच्या लग्नासाठी माईंच्या संस्थेकडून पैसे मागितले जात नाहीत. किंवा बॉण्ड पेपरवर सह्या देखील घेतल्या जात नाहीत. कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन विनय सपकाळ यांनी केले आहे.