नवी दिल्ली – ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचं सांगतात. मात्र नवनीत राणा यांच्यासारख्या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखं काम केलं आहे, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रवी राणा म्हणाले, ” ठाकरे सरकारने आमच्या विरोधात राजद्रोहाचे कलम लावले. हे इंग्रजांच्या काळातील कलम आहे. हे सरकार इंग्रजांचे कायदे पाळते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. इंग्रजांचे कायदे मोडीत काढण्याचे काम मोदी करत आहेत. आम्ही कोर्टाचा आदर करतो आणि केंद्र सरकारचे आभार मानतो.
आमच्याविरोधात राजद्रोहाचे कलम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पोलिसांना लालूच दाखवली असा आरोप रवी राणा यांनी केला.
दिवंगत बाळासाहेबही हे पाहून दु:खी होत असतील आणि विचार करत असतील की कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचारी लंका आहे. मुंबई महापालिकेने नवनीत राणा यांच्या फ्लॅटवर केलेल्या कारवाईबाबत रवी राणा म्हणाले की, २००७ मध्ये इमारत बांधली. त्यानंतर ७-८ वर्षाने फ्लॅट घेतला. अनिल परब संजय राऊत यांचे दहा बारा फ्लॅट आहेत. माझा एकच आहे. आम्ही सर्व परवानग्या घेतल्या. महापालिकेने बिल्डरला सर्व परवानग्या दिल्या. १५ वर्षानंतर आम्हला नोटीस आली. केवळ उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्हाला नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप रवी राणा यांनी केला.