मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. राज्य कसे चालवायचे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिका असा सल्ला नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली असल्याचा आरोप करत त्यांनी याची तक्रार अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. नवनीत राणा आणि रवी राणा सोमवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मी दिल्लीत एफआयआर दाखल करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याची तक्रार करणार आहे.
मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा पाजला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणालाही पत्ता न लागू न देता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्हाला उद्या सकाळी न्यायालयात नेऊ, असे सांगण्यात आले. सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती.
दरम्यान, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करत असून त्यांनी दिलेल्या चौकटीत वक्तव्य करत असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही हनुमान चालीसा, मातोश्री असा शब्ददेखील उच्चारला नसल्याचा दावा त्यांनी केला.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
राज्यात सत्ता असल्याने शिवसैनिकांचा माज पोलिसांच्या जीवावर आहे, असा आरोप राणा दाम्पत्यासह भाजप नेत्यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला राऊतांनी खास सेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. “आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे आहोत, आमच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू. जर तुमची आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असेल तर मग तुमच्या गोवऱ्या अगोदर स्मशानात नेऊन ठेवा आणि मग मैदानात या”, अशा शब्दात संजय राऊतांनी राणा दाम्पत्यासह भाजप नेत्यांनी इशारा दिला.