मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये ‘तुमचे निर्बंध घाला चुलीत! हिंदू सणांवर बंधनं लादू नका’ असे म्हटले आहे.
राम कदमांनी पत्रात म्हटलं आहे की, आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढीपाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केलाय. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालतंय? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे. कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे गाडी रुळावर आलीय. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करत आहेत. लोकांना मुक्तपणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत.
‘आपलं जीवनमान सुरळीत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते प्रत्येकाला व्यवस्थित माहित आहे. पण सरकारने हे करा, हे नका करू.. असं सांगण्यापेक्षा लोकांना मुक्तपणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत. आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठाऊक आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारनं शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले. पोलीस केस करू अशा धमक्या दिल्या. काय झालं ?सरकारला आमच्या विरोधासमोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागले.
कदम यांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत कि ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण बघवत नाहीत. हिंदू सण आले की त्यांना निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी महाराष्ट्राच्या भूमीत ठेचून काढावेच लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल की तुमचे निर्बंध गेले चुलीत’
आम्ही आमचा गुढीपाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच. राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कोणतेही हिंदू सणांवरील निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.