मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यासाठी आघाडी सरकारला ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे. राज्याचे गृहखाते देखील राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यातच आता एका जुन्या प्रकरणात सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या अजामिनपत्राचे वॉरंट हे वर्ष 2008 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्यातील आहे. राज यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांच्याविरोधातील हा खटला जुना आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सांगलीतील मनसे कार्यकर्ता तानाजी सावंत यांनी मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्यावर आंदोलन केले होते. यावेळी काही दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तानाजी सावंत यांच्यासह पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्याच्या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या तारखांना कोर्टात हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज ठाकरे यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही न्यायालयाने पोलिसांना केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले होते. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.