अहमदनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. अहमदनगरमधील घोडेगावजवळ हा अपघात झाला. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.
मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे.
औरंगाबादकडे रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. या पुरोहितांच्या आशीर्वाद घेऊन राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत.