‘सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ या 2019 मधील विधानावरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निकालानंतर दहा दिवसांनी राहुल गांधी आज सोमवारी सुरत सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.
राहुल यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलार येथे एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीनंतर भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरतच्या सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षानंतर २३ मार्च रोजी सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच वेळी राहुल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता आणि शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते स्वत: आज सत्र न्यायालयात उपस्थित राहतील.
खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदानींशी काय नाते आहे? 20 हजार कोटी रुपये कोणाचे?, असे प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधानांना प्रश्न विचारून खूप दिवस झाले. त्याचे उत्तर दिले नाही म्हणून आज परत प्रश्न विचारत आहे, असेही राहुल यांनी पुढे नमूद केले.