पुणे : फुरसुंगी आणि उरळी देवाची ही महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यानुसार ही दोन्हीही गावे महापालिकेतून वगळण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव करावा आणि तो ठराव राज्य सरकारला पाठवण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीत या ठरावास मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार फुरसुंगी आणि उरळी देवाची हे गावे वगळण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये बुधवारी मान्य केला. हा ठराव खास सर्वसाधारण सभेत मान्य केल्यानंतर राज्य सरकारला पाठवण्यात येणार असून, राज्य सरकारकडून त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावरील हरकती सूचनानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद निर्माण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.