मुंबई- मनसुख हिरेन खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी मनसुख हिरेन खून प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांची देखील नावं समोर आली होती.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर हिरव्या रंगाची स्कॉर्पियो संशयास्पद अवस्थेत आढळून आली. गाडीत 20 जिलेटीन कांड्या आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॉर्पियोची नंबर प्लेट अंबानींच्या सुरक्षा घेऱ्यातील गाडीसारखी होती. ही स्कॉर्पियो ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मनसुख हिरेन यांची कसून चौकशी केली. त्यानंतर ही कार ज्यांच्या मालकीची आहे ते मनसुख हिरेन काही दिवसांनी मृतावस्थेत आढळून आले.
5 मार्च 2021 ला सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडीत आढळून आला. पोलिसांनी स्थानिक लोक आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पण, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी ‘मनसुख आत्महत्या करू शकत नाहीत,’ असं वक्तव्य केलं. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे याचे नाव पुढे आले. त्याला अटक केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटलं आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत रचण्यात आला होता. इथेच प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते.
दरम्यान, सचिन वाजेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिले होते. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ठेवली 17 जुलै रोजी आहे.