पुणे – पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी आज सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणे आहे. मात्र गुरुवारी, २१ एप्रिलला ठेकेदारांची थकीत ५८ कोटी रुपयांची बिले अदा केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. परंतु अचानक केलेल्या संपामुळे प्रवाशांचे, नोकरदारांचे हाल होत आहेत.
पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी आज अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ६०० बसची वाहतूक बंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बस ठेकेदारांची बिले थकली होती. त्यामुळे ठेकेदार पीएमपीकडे बिलांची मागणी करत होते. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने गुरुवारी, २१ एप्रिलला ठेकेदारांची थकीत ५८ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. मात्र, त्यानंतरही ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे.
ठेकेदारांच्या बसवरील चालकांनी पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे ठेकेदारांबाबत तक्रार केली होती. त्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा अन्य कोणतीही सुविधा दिली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मिश्रा यांनी सर्व रेकॉर्ड तपासण्याचा आदेश दिला होता. या विषयात पीएमपी प्रशासनाने लक्ष घालू नये, यासाठी ठेकेदारांनी दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे.
दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस (Notice) पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे. पीएमपीमध्ये सुमारे ७ खाजगी ठेकेदारांच्या ९५६ बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे ६५० ते ७०० बस दररोज मार्गांवर धावतात.