पुणे- सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना येत्या आठवडाभरात जाहीर होणार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यासाठी राज्य निवडणूक विभागाने आज महापालिका आयुक्तांसह निवडणूक विभागाच्या अधिकार्यांना मुंबईला बोलाविले आहे. या अधिकार्यांच्या उपस्थितीत अंतिम प्रभागरचनेचे सादरीकरण होणार असल्याचेही सांगण्यात आले.
राज्यातील तब्बल 18 हून अधिक महापालिकांचा कार्यकाळ संपला असून, त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासंबंधीचा कायदाही विधिमंडळात एकमताने करण्यात आला आहे. दरम्यान, यासंबंधीच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, 11 मार्चपर्यंत प्रभागरचना करण्याची जी कार्यवाही झाली होती, तीच पुढे कायम ठेवण्याचे आदेशही दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.