पुणे : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणारे रस्ते प्रचंड जाम होत आहेत. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी ही खरंतर नवीन समस्या नाही पण आता पालकमंत्र्यांनी एक अजब गजब निर्णय घेऊन पुणेकरांना एक सुखद धक्का दिला आहे.
दिवाळीच्या या दहा दिवसांमध्ये कोणतेही चालान फाडले जाणार नाही. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे भर रहदारीतून वाहन बाजूला घेणे किंवा कारवाईच्या प्रक्रियेमुळे वाहतूक कोंडीमध्ये भरच पडते आहे. त्यात आता दिवाळी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले आहेत. अनेक जण गर्दीतून मार्ग काढताना वनवे किंवा पर्यायी मार्गांचा नियम डावलून उपयोग करत आहेत.
एकंदरीत गर्दी पाहता वाहतूक यंत्रणेला देखील या वाहन चालकांवर कारवाई करणं खूप अवघड झाले आहे. त्यामुळेच आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दिवाळीचे हे दहा दिवस कारवाई करण्यात येणार नाहीये. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या त्रासाला कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असून, याचा कितपत उपयोग होतो हे आता समजेलच.